
आज पत्रकार दिन. महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती बाळशास्त्री जांभेकर यांनी. कोणत्याही लोकशाहीवादी देशामध्ये पत्रकारितेला अन्यनसाधारण महत्व असते आणि त्यास कारणही तसेच आहे. लोकशाहीचा चतुर्थ स्तंभ म्हणजे पत्रकारिता होय. लोकांच्या इच्छा,मत त्याच्या महत्वकांक्षा यांचं प्रतिबिंब म्हणजे वृत्तपत्रे. राजकारण्यांना लोकमानस कळतो तो वृत्तपत्रांच्या माध्यमातून. आज दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती झाली आहे. वृत्तपत्राच्या जोडीला सोशल मीडिया आज लोकांच्या दिमतीला आहे. माहितीच्या विस्फोटाचा हा काळ आहे. एका क्लिक मध्ये आपणाला जगभरचे ज्ञान मिळते. पण त्यामुळे पत्रकारांच्या आणि हौसेखातर काहीही लिहिणारांच्या वर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. लेखणीचा वापर संयमशील रित्या व्हायला हवा. लोकांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचं काम पत्रकारांनी करणे गरजेचं आहे.

सामान्य माणसांनी पत्रकाराच्या त्यागाला सलाम केला पाहिजे. यावर्षीची जर आकडेवारी काढली तर फार मोठा धक्का आपल्याला बसेल. अनेक पत्रकारांना यावर्षी आपल्या प्राणाला मुकावं लागलंय.लोकांसाठी त्यांना आपला जीव द्यावा लागला. पत्रकारांना मी आजच्या दिनी शुभेच्या तर देतोच पण ज्यांनी हौतात्म्य पत्करलं अश्या पत्रकारांचे मी स्मरण करतो.