कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही.
तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही.
कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खर्च आटोपशीर ठेवावा.
तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा.
कुटुंबाला वेळ द्या.
घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं.
स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे.
तम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.
कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा.
तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो उर फुटेस्तोंवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.